स्वामी: जी ए कुलकर्णी
बर्याच दिवसात ही अनुदिनी लिहीण्यास सूर गवसला नव्हता. पण ट्युलिपने खो दिल्यावर आता 'आलिया ब्लॉगासि असावे सादर!'
आवडती पुस्तके, आवडते उतारे भरपूर आहेत. (पण ती वाचनालयात शोधून त्यातले उतारे टंकण्याच्या आळशीपणामुळे नेटावरच आयतं काही मिळतंय का शोधलं.एक आवडती कथा, पूर्ण नव्हे, पण त्यातला काही भाग नेटावर मिळाला.)
'स्वामी'. जी. ए. कुलकर्णींची एक समर्थ कथा. माणसाला जगायला किती जागा आणि किती वस्तू लागतात? 'देवा सोडव रे बाबा या त्रासातून' असं त्राग्याने बरेचदा म्हटलं तरी खरंच सर्व समस्यांपासून, व्यक्तींपासून सुटका मिळाली तर ती सुटका सहन होते का? असे अनेक प्रश्न निर्माण करणारी. गावात एकटा पडलेला एक मनुष्य 'आता पुढे काय' या विचारात असताना त्याला एक महंत भेटतो. महंताचे त्यांच्या मठात येण्याचे निमंत्रण हा एकला प्रवासी स्वीकारतो. मठात त्याची चांगली सरबराई होते. रेशमी वस्त्रे, गरम पाणी, चांदीच्या पेल्यातून दूध आणि फळे. 'असे विलासी आयुष्य सहज मिळणार असेल तर जन्मभर येथे राहायची आपली तयारी आहे' असा विचार करणार्या या प्रवाश्याला हे माहिती नाही की जन्मभर इथेच आयुष्य काढायचं प्राक्तन त्याच्या समोर आहे. महंत बोलताना त्यांच्या आद्य गुरुंचा मोठ्या आदराने उल्लेख करतात. स्वामींच्या मृत्यूनंतर पीठ रिकामे आहे आणि एकशे आठ दिवसांच्या आत नव्या स्वामींचा शोध करणे आवश्यक आहे. 'पण अमुक एक माणूस तुमच्या स्वामींचा अवतार बनायला योग्य आहे' हे कसे कळते? प्रवासी कुतूहलाने विचारतो. 'जुन्या स्वामींच्या आसनावर बसून अशा अवतारी पुरुषाने बोट वर केले तर त्याच्या बोटातून बेलाचे त्रिदल उगवते.'
प्रवाश्याला याबाबत कुतूहल वाटते आणि अविश्वासही. त्याला बर्याच पायर्या उतरुन एका अत्यंत अरुंद जागी स्वामींच्या आसनाजवळ एकट्याने नेले जाते. आणि बाहेरुन दरवाजा कायमचा बंद केला जातो! 'पूर्वीच्या स्वामींप्रमाणेच' पूर्ण आयुष्य त्याला आता या खोल भुयारात, अरुंद जागेत काढायचे असते. बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, फक्त योग्य त्या वेळांना जेवणाचे ताट आत सरकवले जाणार आणि भुयारातून वर आणलेल्या हवेच्या नळ्यांमुळे श्वासोश्च्वासाला हवा मिळणार. आपण वाचून सुन्न होतो. शुद्ध फसवणूक आहे ही! पण महंताकडे मात्र कारणमिमांसाही असते. (तीही आपल्याला पटत नाही.) कथा श्वास रोखून पुढे वाचल्याशिवाय राहवतच नाही. त्याच 'स्वामी' कथेतला हा एक उतारा(माफ करा, उतारा जरा जास्त लांबला आहे, पण या कथेतील अगदी छोटासा भाग महत्त्वाचा म्हणून इथे देऊन बाकी भाग वगळणे जमतच नाही, कारण प्रत्येकच उतारा महत्त्वाचा वाटतो. कथा प्रत्यक्षच मिळवून नक्की वाचा. संग्रह- पिंगळावेळ, कथेचे नाव 'स्वामी'.):
या नंतर मी पुढचा खो या व्यक्तींना देते आहे:
अदिती
कोहम
राहुल फाटक
अत्यानंदराव
पूनम
(माफ करा हं, बरेच दिवस या आंतरजालीय खो खो च्या खेळाशी संपर्क नव्हता, त्यामुळे कोणाला दुसर्यांदा खो गेला असल्यास दुर्लक्ष करावे.)
- (बैठे खेळ प्रेमी) अनु.


