या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Thursday 1 March 2007

मी गानसम्राज्ञी गीता दत्त(???)

"कॉलेजच्या वार्षिक संम्मेलनात गाण्यात भाग घ्यायची ज्याना इच्छा असेल त्यानी आपली नावे झुबीन शेख(तृतीय वर्ष यंत्रविज्ञान) कडे दि. २३ जानेवारी पर्यंत द्यावीत. "
नोटीस वाचली..आणि मन हवेत उडायला लागलं..सभागृह भरगच्च भरलं आहे..मी गातेय. गाणे संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला..सगळं कॉलेज आता मला ओळखत होतं..
"देऊया का आपण नावं?"सोनाली माझ्या कानात तिसर्‍यांदा ओरडली. मी भानावर आले.
"हो, देऊया की. दोघी असल्यावर धीर पण येईल."
आम्ही तडक झुबीन कडे गेलो. नावे देऊन आलो. निवडफेरी २४ ता. ला होती.
"काय गाणार आपण?"सोनाली.
"बघू, एखादे छान सर्वाना आवडणारे गाणे गाऊया."मी.
"मी मैने प्यार किया मधलं 'दिल दिवाना' गाईन म्हणते. मला आवडतं आणि पूर्ण आठवतं पण आणि सोपं पण आहे."सोनाली.
"मी एखादं दर्दभरं गाणं गाणार आहे. लोकांच्या हृद्याला भिडलं पाहिजे असं."-मी.
मग असेच हवेत उडत आम्ही तासाला गेलो. तास राईलकर सरांचा. ते खूप रंगून जाऊन शिकवतात, पण विषयच 'बोर' आणि त्यांचा तास मधल्या सुट्टीनंतर, त्याला ते तरी काय करणार? मी मागच्या बाकावर डोळे ताणून 'फ़्लिपफ्लॉप' आणि 'बूलियन लॉजिक' चे फंडे डोक्यात घुसवायचा प्रयत्न करत होते. परत माझं मन गेलं गच्च भरलेल्या सभागृहात!!मी गात होते.एकदम हलकं हलकं वाटत होतं..'समाधीअवस्था' वगैरे यालाच म्हणत असावेत..अचानक.....'यू, सिटींग ऑन लास्ट बेंच!! स्टँड अप!' इति राईलकर गुरुवर्य.'वॉश युवर फेस अँड कम.धिस इस लास्ट टाईम आय ऍम टेलिंग यु.'बापरे.डुलकी कधी लागली कळलंच नव्हतं मला.हरहर!कोण हा दैवदुर्विलास! नेमका आज मधल्या रांगेतला बेंच निवडला होता.सरांच्या डोळ्यांच्या सरळ रेषेत...'तेजोभंग' 'निद्राभंग' आणि रोखलेल्या ३८ डोळ्यांचे तीर सहन करत मी जड पावलांनी बाहेर गेले..पाण्याचा नळ तीन मजले उतरुन थोडे अंतर चालून समोर..पहिल्या मजल्यावर उभे सिनीयर्स.त्याना हा तोंड धुण्याचा प्रसंग बराच मनोरंजक वाटला..त्याना माहिती होतं राईलकरांचा तास चालू आहे..पण आले तोंड धुवून निधड्या छातीने परत वर्गात...
२३ तारखेच्या संध्याकाळी सोनाली म्हणाली,
'माझ्या ताईची मैत्रिण ऑर्केस्ट्रात आहे. ती आपल्याला गाणी सुचवेल.आणि रात्री तू माझ्याचकडे रहा.आपण प्रॅक्टीस करु.'
मग आम्ही दोघी कॉलेज सुटल्यावर सोनालीच्या घरी गेलो.
ताईच्या मैत्रिणीने' गाणी सुचवली ती ऑर्केस्ट्राची असल्याने एकदम वाद्यांचा भरणा असलेली होती. एक ओळ...मग टॅण..टुडुंग..टुंडुंग..दुसरी ओळ...टीरीरीरी..इ.इ.आम्हाला एक पण गाणं पटेना तिने सुचवलेलं..मग आम्ही घरी आलो. 'आपण आपल्याला आवडतात तीच गाणी निवडू.गाणं मनापासून आलं कि आपोआप चांगलं म्हटलं जाईल.'-सेंटीमेंटल मी.मग आमची प्रॅक्टीस सुरु झाली. 'केस वळवायचा गोल कंगवा' हा माईक हातात घेऊन. सोनाली गात चांगली होती. आता मी सुरुवात केली.
"तू २ ओळींच्या मधेमधे श्वास घेतेयस तो माईक मधे(कंगव्यामधे??) ऐकू जातो आहे."-सोनाली.
"मग मी काय करु? श्वास न घेता पूर्ण गाणं गायला मी काय शंकर महादेवन आहे?"-मी.
"झेपणारं गाणं निवड. हे गाणं खूपच हायफाय आहे.कळतं आहे तुला झेपत नाहीये ते. गाण्याचे कष्ट चेहर्‍यावर दिसतायेत."-सोनाली.

गाणं होतं गीता दत्तचं 'वक्त ने किया क्या हसीं सितम..'"मला हे आवडतं आणि हे मी चांगलं म्हणू शकते. मी माईक दूर धरेन म्हणजे श्वास ऐकू जाणार नाही."-मी.अशी रात्री १ पर्यंत आमची सुरांशी झटापट चालू होती. मग 'कपडे कोणते घालावे' 'हायहिल्स घालावे का' 'लिपस्टिक लावावी कि ते जास्तच शायनिंग वाटेल?' इ.इ. गहन प्रश्नांवर चर्चा झाली...शेवटी निवडलेल्या कपड्याला इस्त्री करुन आम्ही दोघी शांत झोपलो स्वप्ने बघत..

'निवडफेरी' चा दिवस आला..हॉल निवडफेरीला पण गच्च भरला होता..मुत्सद्दीपणा करुन झुबीनच्या मागच्या बाकावर बसून कौशल्याने त्याच्या हातातली यादी पाहण्याचा सर्वांचाच प्रयत्न होता.. पण आधी आलेल्या २ मैत्रिणींच्या वशिल्याने एकदाची मोक्याची जागा पटकावली.. गात सगळेच सही होते..सोनालीचा नंबर आला..'दिल दिवाना' तिने चांगले म्हटले...पण दुसरे कडवे तिला आठवेच ना..मी तोंड हलवून सांगत होते..पण 'मूकबधिर समाचार' चुकले असावेत..तिने एक कडवे २दा म्हटले..पुढे एका मुलाने 'माकारीना' गाण्याचे विडंबन म्हटले. त्याला भरपूर हशा आणि टाळ्या मिळाल्या..आता माझा नंबर आला. 'माकारीना' साठीच्या हशा आणि टाळ्या संपतच नव्हत्या.. माझ्या पोटातला गोळा वाढत होता‌. शेवटी मी धीर करुन माईक हातात घेतला, आणि म्हणाले, 'सायलेन्स अँड प्लीज को ऑपरेट!!' (मागून १ आवाज आला..'प्लीज को-ऑपरेट?? हॅ हॅ हॅ!!चक्रमच आहे!')
मी सुरु केले 'वक्त ने किया क्या हसीं सितम तुम रहे ना तुम.हम रहे ना हम..'
मधेच चोरट्या नजरेने सोनालीकडे पाहिले. 'श्वास ऐकू येतोय तुझा..' ती खाणाखुणांनी सांगत होती..मग मी माईक थोडा मागे घेतला..
आता 'बेकरार दिल इस तरह मिले...' बापरे..आवाज चढेचना..'बेकरार दिल' खुल्या आवाजात.. पुढचे 'इस तरह मिले' दम लागल्यामुळे जवजवळ घशात..अरे बापरे.. अजून 'जिस तरह कभी हम जुदा न थे' ला वरची पट्टी. शेवटी 'जिस तरह कभी'(किंचाळून)......हम जुदा न थे..(आवाज फाटला..)आता प्रेक्षकांतून फाटलेल्या आवाजाच्या नकला सुरु झाल्या..कोणीतरी मागून 'म्यांव' केले.. मी चोरट्या नजरेने पुन्हा सोनाली कडे पाहिले..ती कपाळाला हात लावून खाली बघत होती. त्यानंतर मी एकदम राजधानी एक्सप्रेसच्या वेगात 'हम भी खो गये तुम भी खो गये एक राह पर..चलके दो कदम...' म्हणून परत धृपद न म्हणता 'थँक्यू' म्हणून विजेच्या वेगाने येऊन माझ्या जागेवर बसले.. 'टाळ्यांचा कडकडाट' नाही पण हशाची झुळूक आली..त्यानंतर बरेच दिवस मी जाईन तिथे मुलं भावपूर्ण चेहरा करुन सुरु करत...'वक्त ने किया..क्या हसीं सितम..तुम रहे ना तुम...........हम रहे ना हम...'

माझ्या गाण्याने कॉलेजमधे सर्व मला ओळखतील' हे माझं स्वप्न पूर्ण झालं होतं..पण वेगळ्या प्रकारे!!!!
-अनुराधा कुलकर्णी

1 comment:

Abhijit Bathe said...

Good!

Now I guess the comments are academic just because I think its unethical if I dont let you know that I liked this post.
Thats like having something without paying for it!